उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (ता. 21) भरदिवसा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वीही या मुलीला अशाच पद्धतीने पळवून नेण्यात आले होते, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी 75 वर्षीय आजोबांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली मुलगी, जावई आणि नातवासोबत उरुळी कांचन येथे राहतात. त्यांचा मुलगा हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि तो पुणे येथे राहतो. 14 जूनला फिर्यादी यांच्या मुलाने आपली मुलगी हिला उरुळी कांचन येथे आजोबांकडे आणून सोडले होते. तेव्हापासूनती आजोबांकडेच राहत होती.
रविवारी (ता. 21) सकाळी साडेआठ वाजता घरातील इतर सदस्य नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी शेतावर निघून गेले होते आणि घरात केवळ वर्षीय आजोबा आणि नात हे दोघेच होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुलगी आजोबांना काहीही न सांगता घरातून अचानक गायब झाली. आजोबांनी आणि नातेवाईकांनी उरुळी कांचन परिसर, व सर्व नातेवाईक आणि पुण्यात तिच्या आई-वडिलांकडे शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, यापूर्वीही अल्पवयीन मुलीला अशाच प्रकारे फुस लावून पळवून नेण्यात आले होते, तेव्हा बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती मिळून आली होती. त्यामुळे आता पुन्हा तिला कोणीतरी फुस लावून पळवल्याची आजोबांची खात्री झाली. याप्रकरणी आजोबांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.







