जामखेड, ता. 2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या जामखेड तालुक्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार २०२६’ वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी *’श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती’*चे सदस्य पांडुरंग माने आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आनंद भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. याची गंभीर दखल घेत सीईओंनी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनानुसार, दरवर्षी ३१ मे रोजी प्रदान करण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींपैकी केवळ दोन ते चार ग्रामपंचायतींमध्येच वितरित करण्यात आला. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये पुरस्कार वितरणच झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही याच प्रकारे पुरस्कार वितरणात टाळाटाळ करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात पाटोदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत सातपुते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कर्तृत्ववान महिला पुरस्काराऐवजी महिलांना वेगळाच पुरस्कार देऊन तोच अधिकृत पुरस्कार असल्याचे सांगत दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचे सांगत ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, तालुक्यातील अशा प्रकारच्या गैरप्रकारांना अभय देत असल्याचा आरोप करत जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनासह उपोषण करण्याचा इशाराही पांडुरंग माने आणि नितीन राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाशी संबंधित पुरस्कार वितरणात झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकारामुळे जामखेड तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आता प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







