पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकल्याने व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा केवळ एक अपघात असल्याचे भासवले गेले, मात्र पोलिसांच्या कसून तपासानंतर हे एक पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया आणि चेतन यांनी हे कृत्य अतिशय थंड डोक्याने केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून दोघांनी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चेतनने टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून आपली ओळख पटू नये, म्हणून चक्क स्कूटरवरून ९० किलोमीटरचा प्रवास करून लोहगड गाठला होता. तसेच, या हत्येपूर्वी त्यांनी पुण्याच्या एका टेकडीवर या घटनेची ‘रिहर्सल’ (सराव) देखील केली होती.

सिया आणि चेतन यांनी या कटाची आखणी १७ जून रोजी पुण्यात एका कॅफेमध्ये भेटून केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर, घटनास्थळी सियाने केतनला खाली ढकलण्यापूर्वी चेतनला एक पूर्वनियोजित ‘सिग्नल’ दिला होता.
सध्या या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे, कारण प्रत्यक्ष पुरावे गोळा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयलची ‘पॉलीग्राफ’ (लाय-डिटेक्टर) चाचणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, या कटाविषयी आणखी कोणाला माहिती होती का? याचाही तपास सुरु आहे.







