लोणी काळभोर, ता. 23: मागील 15 दिवसांच्या (Loni Kalbhor) कालावधील चोरट्यांनी विवाह स्थळे चोरीचे अड्डे बनवले आहे. चोरट्यांनी विवाह सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दोन वेगवेगळ्या मंगल कार्यालयातील नागरिकांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच, आता चोरट्यांनी थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन पॅलेस या मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यात रोख रकमेसह चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 14 लाखांच्या सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता.22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नसराईत सोन्याचे दागिने चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. परंतु, पोलिसांना अद्यापही एकाही चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अच्युत भालचंद्र भगत (वय -66, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, पुणे सातारा रोड, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अच्युत भगत यांचा मुलाचा विवाह हा थेऊर येथील वृंदावन पॅलेस या मंगल कार्यालयात शनिवारी (ता.22) करण्यात आला. अच्युत भगत यांनी विवाह सोहळ्यात सुनेला घालण्यासाठी सोन्याचांदीचे दागिने बनवले होते. विवाहाच्या दिवशी हे दागिने घेऊन भगत कुटुंब हे ठरल्याप्रमाणे विवाहस्थळी आले होते. अच्युत भगत यांनी नवरीच्या दागिन्यांची बॅग त्याच्या मुलीकडे दिली होती.
दुपारी जेवण करताना मुलगी बॅग पायाजवळ ठेवून जेवत करीत होती. जेवण केल्यानंतर त्यांनी बॅग घेण्यासाठी पायाजवळ हात घातला परंतु, त्यांना बॅग मिळून आली नाही. भगत कुटुंबीयांनी बॅगची सर्वत्र शोधाशोध केली, परंतु, बॅग कोठेही मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी भगत यांनी या घटनेची माहिती तत्काळ लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार दिगंबर सोनटक्के व त्यांचे सहकारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले.
दरम्यान,लोणी काळभोर पोलिसांनी बॅग शोधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला मात्र. पोलिसांना बॅग मिळून आलेली नाही. अज्ञात चोरट्यांनी जेवण करताना बॅग खाली ठेवल्याची संघी साधून 5 मिनिटाच्या आत बॅग लंपास केली. चोरट्यांनी या चोरीत नवरीचे स्त्रीधन म्हणून केलेले सुमारे साडे दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड, पैजण व महत्वाची कागदपत्रे असे चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे 13 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत.
मंगल कार्यालयात सीसीटीव्हीची कमतरता
पूर्व हवेलीत अनेक प्रसिद्ध हॉल, मंगल कार्यालये आहेत. या कार्यालयात नेहमी छोटे-मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यालयांची लाखो रुपयांपेक्षा अधिक भाडे एका दिवसाचे आकारले आहे. परंतु, काही मंगल कार्यालये वगळता मंगल कार्यालाच्या मालकांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपयोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. थेऊर येथील वृंदावन पॅलेस या मंगल कार्यालयात देखील सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनाही या गुन्ह्याच्या तपासात अडचणी आल्या आहे. लाखो रुपये देऊनसुद्धा मंगल कार्यालयातील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावरच म्हणावे लागेल.
दागिने चोरीचे सत्र सुरूच
कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कुंजीरलॉन्स या मंगल कार्यालयात रविवारी (ता.8) विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात नमीता सुभाष मोरे (वय 54, रा. सुर्यवंशी टावर, बी-20, भेकनाई नगर हडपसर पुणे) यांनी सुनेसाठी केलेले 7 लाख 50 हजार रुपयांचे स्त्रीधन चोरून नेले होते. त्यानंतर धनश्री लॉन्स या मंगल कार्यालयात सुभाष किसन हगवणे (वय 65, रा. मु.पो. नायगाव ता. हवेली जि. पुणे) व बाळासाहेब सुदाम पवार या दोघांच्या गळ्यातील अडीज तोळे वजण्याच्या सोन्याच्या चैन चोरट्यांनी चोरून रविवारी (ता.16) चोरून नेल्या. त्यातच अच्युत भालचंद्र भगत यांनी सुनेसाठी केलेले दागिने व रोकड असा सुमारे 14 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यामुळे सद्यातरी चोरीचे सत्र सुरूच आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
मागील पंधरा दिवसाच्या कालावधीत चोरट्यांनी तिन वेगवेगळ्या मंगल कार्यालयात शिरून नागरिकांचे 24 लाखांहून अधिक रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. पुणे शहर पोलिसांची एवढी तगडी यंत्रणा असतांना देखील या गुन्ह्याची उकल करण्यास अद्यापपर्यंत लोणी काळभोर पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे भविष्यात अजूनही चोरीचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.







