पुणे: पुणे आणि विशेषतः हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चा पहिला टप्पा 15 जुलैपर्यंत सुरु होईल, असा प्रशासनाचा दावा होता. मात्र, अनेक वेळा तारखा जाहीर होऊनही मेट्रो सेवा सुरू न झाल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सध्या या मार्गाचे तांत्रिक काम पूर्ण झाले असून, सुरक्षिततेच्या तपासणीचा टप्पा सुरू आहे. 5 ते 9 जुलै या कालावधीत ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी’ (CMRS) च्या पथकाने या मार्गाची पाहणी केली होती. आता सर्वांना केवळ त्यांच्या अंतिम सुरक्षा अहवालाची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले आहे की, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक तयारी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे, आता ही मेट्रो सेवा जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी 15 जुलैपर्यंत मेट्रो धावेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. परंतु, सुरक्षेच्या मानकांमुळे आणि अंतिम परवानगीअभावी हा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता सर्वांचे लक्ष केवळ ‘CMRS’च्या मंजुरीकडे लागले असून, हा अहवाल मिळाल्यानंतरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल.






