पुणे: शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अमलात आणली आहे. या कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 8 हजार 41 थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरीत्या भरली आहे. ही माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे आणि त्यांचा शेती व्यवसाय अधिक सक्षम बनवणे हा आहे. सहकार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेने ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, आंबेगाव तालुक्यात ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जुन्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ याप्रमाणे थकबाकीदार शेतकरी या पोर्टलवर नोंदवले गेले आहेत. याशिवाय इतर तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नावांची नोंदणी झाली आहे.

दरम्यान, या माहिती भरण्याच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी देखील समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील 113 शेतकरी या योजनेसाठी पात्र असूनही त्यांचा मृत्यू झाला आहे आणि अद्याप त्यांची वारस नोंद झालेली नाही, त्यामुळे त्यांची नावे जोडता आलेली नाहीत. तसेच, 29 शेतकरी पात्र असतानाही त्यांच्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे त्यांची माहिती पोर्टलवर प्रविष्ट होऊ शकलेली नाही.
ही कर्जमुक्ती योजना बळीराजासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना या योजनेचा थेट आर्थिक फायदा घेता येईल.







