आदित्य बोराटे

इंदापूर: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील तयारीचा सर्वंकष आढावा शुक्रवारी तहसील कार्यालयात घेण्यात आला. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालखी मार्गावरील मूलभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यंदा इंदापूर तालुक्यातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज, संत चांगावटेश्वर महाराज, संत निळोबाराया महाराज आणि संत चौरंगीनाथ महाराज या पाच पालखी सोहळ्यांचे मार्गक्रमण होणार असून, तालुक्यात एकूण १६ मुक्काम नियोजित आहेत. या काळात लाखो वारकरी आणि भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
पाणीपुरवठा विभागामार्फत आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. भाविकांना सुरक्षित आणि अडथळामुक्त प्रवास करता यावा, यासाठी संबंधित विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेऊन त्यानुसार बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. पालखीसोबत ५० पोलीस मोटारसायकली कार्यरत राहणार असून, मुक्कामस्थळी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तसेच मान्यवरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंचायत समितीमार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी फिरती सार्वजनिक स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, मोबाईल चार्जिंग सुविधा, चरणसेवा तसेच महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्य विभाग, महावितरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले, गटविकास अधिकारी सचिन खुडे,नगराध्यक्ष भरत शहा, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनाली जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी,उमेश मखरे,शकील सय्यद,शुभम पवार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उंबरे, भारत शिंदे,अजिंक्य जावीर, निखिल महाजन,प्रवीण हरणावळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या स्थितीकडे लक्ष वेधले
बैठकीदरम्यान इंदापूर तहसील कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरत असून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा अपुरी असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्हा परिषद सदस्य निर्मला सागर मिसाळ यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तातडीने स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.







