यवत: दौंड तालुक्यातील चौफुला–बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्र (Renuka Kala Kendra) येथे एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वादाचं कारण काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान घडली. साहिल बापू जाधव या युवकाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पाटस येथील आदिनाथ उर्फ आदित्य ईश्वर गिरमे, रोहित राजू भिसे व त्यांच्या सोबतचे दोन अनोळखी व्यक्ती यांनी, “तू पाटस टोलनाक्याजवळ आम्हाला रागाने का पाहिले?” असा सवाल करत त्याच्यावर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात लोखंडी कोयत्याचा वापर करण्यात आला असून, साहिलच्या हात, मान व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी त्याच्या जिवावर उठण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आदिनाथ उर्फ आदित्य गिरमे, रोहित भिसे (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात यवत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.







