पुणे: पुणे येथील उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून अनेक महत्त्वाचे दावे फेटाळले आहेत आणि केतनच्या जाण्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रवीण गोयल यांनी लग्नाबद्दल पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळ्याला 3 ते 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता आणि त्यासाठी विशेष विमाने बुक केली नव्हती करणार होते, दरम्यान, अनेक बातम्या असत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सियाच्या प्रेमप्रकरणाबाबत किंवा चेतन चौधरी नावाच्या व्यक्तीबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. चेतन नावाच्या मुलाला आम्ही कधीही पाहिले नाही किंवा त्याच्याशी आमचा संवादही झाला नाही, असे ते म्हणाले.

केतन हा आमच्यासाठी केवळ होणारा जावई नव्हता, तर तो आमच्या स्वतःच्या मुलासारखा होता. आम्हाला केतनबाबत कोणतीही नाराजी नव्हती, असे सांगताना ते भावूक झाले. या प्रकरणात सखोल तपास व्हावा आणि सत्य समोर यावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. जर या गुन्ह्यात माझी मुलगी दोषी असेल, तरीही तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ज्या किल्ल्यावरून आमचा केतन खाली पडला, तिथूनच जो कोणी दोषी आढळेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, तिला तिथून खाली ढकलून दिले पाहिजे…; असेही सियाचे वडील म्हणाले.
सियाची आई पूजा गोयल यांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. जर न्यायालयात आरोप सिद्ध झाले, तर आपली मुलगी दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा दिली तरी आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक केली आहे. सध्या तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुराव्यांची छाननी सुरू आहे.







