लोणी काळभोर, ता. २५ : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी मानत ऋणानुबंध संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ५०० वह्यांचे वाटप गुरुवारी (ता. २५) करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, ऋणानुबंध संस्थेच्या सीमा राहिंज, सारिका माळी, हेमा वर्मा, कविता ननावरे, शितल आढाव, लीना जाधव, महेश खूळपे, शिवाजी काळभोर, प्रशांत काटकर, महेश खराडे, साहिल इनामदार, मयूर चांदणे, महादेव गरड तसेच कन्या प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शाहीर महेश खूळपे म्हणाले, “शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य असून त्यातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही मदत नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक छोटीशी गुंतवणूक आहे. पुस्तक आणि वही हीच विद्यार्थ्यांची खरी संपत्ती असते. ज्ञानाच्या प्रवासात प्रत्येक पान यशाची नवी दिशा दाखवत असते. आज मिळालेली ही वही केवळ लिहिण्यासाठी नसून विद्यार्थिनींच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आहे. या वहीतील प्रत्येक पानावर त्यांच्या यशाची कहाणी लिहिली जावी, हीच अपेक्षा आहे.”
दरम्यान, ऋणानुबंध संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश देण्यात आला. समाजोपयोगी कार्याची भावना जपत भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हाच या उपक्रमाचा खरा पुरस्कार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे आभार मानण्यात आले.







