पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याकांडातील गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केतनच्या मृत्यूनंतर सांत्वना देण्यासाठी घरी आलेल्या सियाच्या संशयास्पद वागण्याकडे केतनच्या बहिणीचे लक्ष गेले. तिने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपींचा पर्दाफाश करणे पोलिसांना सोपे झाले.

तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. सिया आणि चेतन मागील अनेक दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात होते. मागील 6 महिन्यांत त्यांच्यात व्हॉट्सॲप आणि फेसटाइमच्या माध्यमातून तब्बल 2,004 वेळा कॉल झाल्याचे कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे. गुन्हा करताना आपले लोकेशन पोलिसांना समजू नये, म्हणून चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानात सोडून कर्मचाऱ्याचा फोन वापरल्याची चलाखी केली होती. ठरल्याप्रमाणे, 18 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले, जिथे दबा धरून बसलेल्या चेतनने केतनवर जीवघेणा हल्ला करून त्याला दरीत ढकलले.

पोलिसांनी जेव्हा दोघांना, “लग्न करायचे नव्हते तर पळून का गेला नाही?” असा प्रश्न विचारला, तेव्हा चेतनने खळबळजनक खुलासा केला. सिया एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने, पळून गेल्यामुळे होणारी बदनामी त्यांना नको होती. ही बदनामी टाळण्यासाठी आणि कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठीच त्यांनी केतनला रस्त्यातून कायमचे हटवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली चेतनने दिली.
सिया आणि चेतन यांची भेट मागील दिवाळीतील एका पार्टीत झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सियाचे लग्न केतनशी ठरले होते, परंतु तिला हे मान्य नव्हते. त्यामुळे केतनचा काटा काढण्यासाठी त्यांनी रचलेला हा कट आता उघड झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून सोशल मीडियावर आरोपींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.







