बारामती: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या (Baramati and Rahuri By Election) राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या चार राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांतील विधानसभांच्या 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तर दुसरीकडे, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघही रिक्त झाला असून या दोन्ही जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 एप्रिल 2026 ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 असेल. या दोन्ही मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे 2026 रोजी मतमोजणी करण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नसल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे बारामतीत अन्य कोणता उमेदवार रिंगणात उतरणार का, की ही निवडणूक बिनविरोध होणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे भाजपकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतही उत्सुकता आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राहुरीतील पोटनिवडणूकही राजकीयदृष्ट्या रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जात असून या निकालाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठीही या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.







