Aastad Kale : मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळे सध्या त्याच्या सविता दामोदर परांजपे या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. मात्र माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरमध्ये या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एक धक्कादायक प्रकार घडला. नाटकाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रवेश सुरू असताना प्रेक्षकांमधील एका व्यक्तीचा मोबाईल फोन वाजला. इतकेच नाही तर ती व्यक्ती चक्क मोठ्या आवाजात फोनवर बोलू लागली. यामुळे व्यत्यय आल्याने आस्ताद काळेचा संयम सुटला आणि त्याने नाटक अर्ध्यावरच थांबवले.

नाट्यगृहात नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना मोबाईल फोन सायलेंट ठेवण्याच्या किंवा बंद करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. असे असूनही काही प्रेक्षक या नियमांचे पालन करत नाहीत. आस्तादने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. तो थेट रंगमंचाच्या समोरच्या बाजूला आला आणि त्याने फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला खडेबोल सुनावले. तो म्हणाला की आम्ही तुमच्या वतीने फोनवर बोलतो आणि तुम्ही स्टेजवर येऊन आमचे काम करा. अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रसंगानंतर आस्तादने पुन्हा आपल्या जागेवर जाऊन उपस्थित इतर सर्व प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. नाटक मध्येच थांबवावे लागल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली.
सांस्कृतिक कलादर्पणच्या व्यावसायिक नाट्य महोत्सवादरम्यान हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगात मोबाईलमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
आस्तादने ज्या पद्धतीने शिस्त पाळण्याचे आवाहन केले, त्याचे अनेक नेटिझन्स आणि नाट्यप्रेमींकडून कौतुक होत आहे. कलाकारांच्या एकाग्रतेमध्ये अशा प्रकारे अडथळा निर्माण होणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रागाच्या भरातही त्याने नंतर दाखवलेला मोठेपणा आणि मागितलेली माफी यामुळे आस्ताद काळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.







