आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीत सहकार (Alandi Scam) चळवळीच्या विश्वासालाच तडा देणारा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. आळंदीतील चावडी चौक (Pune Scam News) परिसरात असलेल्या अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 11 कोटी 3 लाख 13 हजार 380 रुपये रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाने संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची आर्थिक उलाढाल ज्या संस्थांवर अवलंबून आहे, त्याच संस्थांमधून असा गैरप्रकार घडल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (Latest Marathi News)

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक बाळू अर्जुन पवार याने आपल्या पदाचा गैरवापर करत संस्थेतील सोनार पूर्णानंद खोलम आणि ऑडिटर संजय लांडगे यांच्याशी संगनमत केले. या तिघांनी मिळून कागदोपत्री सोनेतारण कर्जाचा बनाव उभा केला. प्रत्यक्षात कोणतेही सोने गहाण न ठेवता, किंवा बनावट तपासणी अहवाल तयार करून, बोगस कर्जदारांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर झाल्याचे दाखवण्यात आले. ही संपूर्ण रक्कम संस्थेच्या खात्यातून परस्पर काढून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सोन्याची तपासणी आणि कर्ज मंजुरीबाबत खोटे अहवाल सादर करून संचालक मंडळाची दिशाभूल करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष संजय जयसिंग शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा अपहार 24 नोव्हेंबर 2025 पूर्वीच्या कालावधीत झाल्याचे सांगितले जात असून 23 जानेवारी रोजी उशिरा तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणात ऑडिटर संजय लांडगे आणि सोनार पूर्णानंद खोलम यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी बाळू पवार फरार आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यभरातील नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे सातत्याने समोर येत आहेत. बनावट सोनेतारण, बोगस कर्जवाटप आणि अंतर्गत संगनमत यामुळे सामान्य कष्टकरी, शेतकरी आणि पेन्शनधारकांची आयुष्यभराची पुंजी धोक्यात येत आहे. बँकांच्या तुलनेत पतसंस्थांमधील ठेवींना असलेले विमा संरक्षण अत्यल्प असल्याने, अशा संस्था अडचणीत आल्यास ठेवीदार अक्षरशः उघडे पडतात. आळंदीतील हा घोटाळा केवळ एका पतसंस्थेचा प्रश्न नसून, सहकार व्यवस्थेतील देखरेख, ऑडिट आणि जबाबदारी यंत्रणेचे अपयश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर इशारा आहे.







