पुणे: लोणावळा, खंडाळा आणि संपूर्ण मावळ तालुक्यात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा प्रवाही झाले असून, पर्यटकांनीही पावसाचा आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. विशेषतः लोणावळ्याजवळील सहारा पुल परिसरातील धबधब्यांमध्ये पर्यटकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवन मावळ परिसरात पवना धरणाच्या पाण्यावर केलेल्या भात पेरणीची रोपे चांगली वाढली असून, अनेक ठिकाणी भातलावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांतील शेतांमध्ये पाणी साचले होते. त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल झाल्याने शेतीच्या कामांचे नियोजन विस्कळीत झाले होते. यंदा मात्र परिस्थिती उलट राहिली. मोसमी वारे मंदावल्याने आणि हवामानातील बदलांमुळे मान्सून जवळपास महिनाभर उशिरा पोहोचला. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मावळ परिसरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या 24 तासांत लोणावळ्यात 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तरीही यंदाच्या हंगामातील एकूण पावसाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे. या वर्षी आतापर्यंत 473 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, याच कालावधीत गेल्या वर्षी जवळपास 1,998 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदाही पावसाची भरपाई होण्यासाठी पुढील काही आठवडे चांगल्या पावसाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.







