न्हावरे : शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रात जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे वाळूमाफियांचे अक्षरशः फावले असून, महसूल व पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ निलेश भुजंगराव कोंडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिरूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने धडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या अवैध वाळू उपशामागे महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच वरदहस्त असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

कोंडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २८ जूनपासून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने राजरोसपणे वाळूची चोरी केली जात आहे. या प्रकाराची माहिती २९ जून रोजी शिरूर पोलिस ठाण्यास देण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायत प्रशासनालाही लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनीही स्वतंत्र पत्राद्वारे तहसीलदारांकडे कारवाईची मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मात्र,तक्रारींना चार ते पाच दिवस उलटूनही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप कोंडे यांनी केला आहे. परिणामी, वाळूमाफियांचे मनोबल वाढत असून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणातील व्हिडिओ पुरावे तपासून अवैध वाळू उपशात वापरण्यात आलेले जेसीबी, ट्रॅक्टर व इतर वाहने तातडीने जप्त करावीत, संबंधित चालक, मालक व अन्य जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. अशी मागणीही कोंडे यांनी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती पुणे जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महसूल व पोलिस प्रशासन या गंभीर प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते आणि वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारते का,याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
“तक्रार केली; उलट धमक्या मिळू लागल्या”
याबाबत निलेश भुजंगराव कोंडे म्हणाले, “भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत मी वेळोवेळी महसूल व पोलिस प्रशासनाला लेखी तक्रारी करून माहिती दिली. मात्र कारवाई होण्याऐवजी वाळू माफियांकडून मलाच धमक्या दिल्या जात आहेत.त्यामुळे महसूल प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद वाटत आहे.प्रशासनाने तातडीने अवैध वाळू उपसा बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी कोंडे यांनी केली आहे.






