पुणे, ता. १० : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या राजकीय हिताला हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठविल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद शिंदे यांनी, “पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडणूक लढता येऊ नये, यासाठी नियोजनबद्ध कट रचण्यात आला. पक्षाने निवडणूक लढूच नये, असे वातावरण मुद्दाम तयार करण्यात आले,” असा गंभीर आरोप केला.
शिंदे यांनी पक्षांतर्गत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “वाटाघाटी करणारे आणि विरोधी पक्षांना छुपा पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपला मदत झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी केली.
यावेळी त्यांनी महापालिका निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोपही केला. “आघाडीतील सहकार्याच्या अपेक्षेने आम्ही वाटचाल केली; मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच्या राजकीय हिताला धक्का बसला,” असे ते म्हणाले.
पुण्यातील राजकीय घडामोडींवर या आरोपांमुळे नव्याने चर्चा सुरू झाली असून, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या तक्रारीची दखल घेतली जाणार का, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.






