शिक्रापूर : एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना नाहक त्रास देणाऱ्या, तसेच बेकायदेशीरपणे कामांचे कंत्राट मागून धमकावणाऱ्या गुंडांविरुद्ध आता थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा शिक्रापूर पोलिसांनी दिला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (दि. 3) शिक्रापूर पोलीस ठाण्यात एमआयडीसीतील विविध कंपन्यांच्या एचआर मॅनेजर्स आणि प्रतिनिधींची एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत कंपन्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत बेकायदेशीर कंत्राट आणि खंडणीखोरीला आळा घालण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.अनेकदा स्क्रॅप, लेबर, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, हाऊसकिपिंग किंवा पाणी टँकर यांसारख्या कामांचे ठेके मिळवण्यासाठी काही स्थानिक व्यक्ती किंवा संघटना कंपन्यांवर दबाव आणतात. अशा प्रकारे कोणीही धमक्या देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर कंपन्यांनी न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा तक्रारींवर पोलीस प्रशासन त्वरित आणि कठोर कायदेशीर पावले उचलणार आहे.
सुरक्षेसाठी या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील चोऱ्या रोखणे, वाहतूक कोंडी सोडवणे आणि रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवणे यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच, कंपन्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे अद्ययावत ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस २४ तास सहकार्य करण्यास तयार आहेत, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
या बैठकीला क्रोम वेल इंजिनिअरिंगचे निलेश गव्हाणे, संदीप दिवेकर, जॉन डीअरचे राम अहिरे, अलिकॉनच्या श्रीमती जाधव यांच्यासह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या मांडून पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, उपनिरीक्षक तुषार भोर आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.







