पुणे: बारामती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी पक्षातीलच जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षे आपली फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ही घटना 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान घडली. सभागृहात कामकाज सुरू असताना भाग्यश्री धायगुडे अचानक आत आल्या आणि त्यांनी सोबत आणलेली पेट्रोलची बाटली अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, उपस्थित पोलिस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

भाग्यश्री धायगुडे यांनी सांगितले की, कॉलेजच्या काळापासून त्यांचे आणि मंगेश जगताप यांचे संबंध होते. लग्न करण्याचे आश्वासन देऊन अनेक वर्षे आपली दिशाभूल करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. नंतर मंगेश जगताप यांनी दुसरे लग्न केल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत विचारणा केल्यानंतर घटस्फोट घेणार असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखवण्यात आली होती. मात्र, ती कागदपत्रे बनावट असल्याचा दावा त्यांनी केला.
पीडितेने संताप व्यक्त करत सांगितले की, गेली तीन महिने आरोपी पूर्णपणे गायब आहे आणि समोर दिसल्यास पळून जातो. आमच्या लग्नाची तारीख ठरली होती आणि महाबळेश्वरमधील रिसॉर्ट देखील बुक करण्यात आले होते. “माझ्या २१ वर्षांच्या आयुष्याशी असा खेळ का खेळला?” असा सवाल महिलेने उपस्थित केला आहे.
या प्रकरणात जगताप यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या व्यक्तींचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्याय मिळावा यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आपण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांवर मंगेश जगताप यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका लोकप्रतिनिधीवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.







