पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) विलिनीकरणाच्या चर्चेला (Maharashtra Politics) सध्या ब्रेक लागल्याचे चित्र दिसत असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची (Sunetra Pawar) चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Supriya Sule) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही गटांमधील दरी अधिकच वाढल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

तरीही, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी भावना कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विलिनीकरणाचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नसून, त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशी थेट चर्चा होणे महत्त्वाचे ठरू शकते. त्या निर्णयक्षम नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज 2 महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पक्षात त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, कुटुंब आणि पक्ष यांच्यातील समतोल ढासळल्याची भावना काही नेत्यांमध्ये आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच झालेल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये घाईगडबडीत निर्णय झाल्याची टीका झाली होती. विशेषतः सुनेत्रा पवार यांनी चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वाद निर्माण झाला. या प्रक्रियेबाबत माहिती नव्हती, असे शरद पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन वेगळे प्रवाह दिसत आहेत. एकीकडे आरोप-प्रत्यारोप आणि दुसरीकडे एकत्र येण्याची आशा. पुढील काही दिवसांत नेतृत्व पातळीवर संवाद झाला, तर विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा गती मिळू शकते. मात्र सध्यातरी राजकीय वास्तव हे मतभेदांच्या छायेतच दिसत आहे.







