पुणे: महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार दिसून येत असून 16 जून रोजी राज्यातील विविध भागांसाठी उष्णता आणि पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, तर 5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात काही ठिकाणी उकाडा जाणवणार असला तरी काही भागांत पावसाची हजेरी लागू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारच्या काळात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. मात्र नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही उष्ण व कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
राज्यातील बहुतांश भागांत उष्णता, ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी पावसाची स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणीचे नियोजन करावे.







