पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बगाडवाडी येथे कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या वडिलांचा आणि सख्ख्या भावाचा खून केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृतांमध्ये जयराम महादू मुकणे (वय 65) आणि राजू जयराम मुकणे (वय 30) यांचा समावेश आहे. या प्रकरणी युवराज मुकणे यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबाजी जयराम मुकणे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झाले होते. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत होती. त्यानंतर पुन्हा लग्न लावून द्यावे, अशी मागणी तो सातत्याने वडील आणि भावाकडे करत होता. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत होते. अखेर संतापाच्या भरात आरोपीने वडील आणि भावावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.

दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात अवघ्या 12 तासांच्या अंतरात दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत अमोल अहिरे (वय 17) या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मंदाबाई अंगारखे (वय 45) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.
या सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.








