पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी (Pune Election) आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी गैरप्रकारांच्या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेवर (Pune Mahapalika Election) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकार, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करून जाणे अशा तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी नागरिकांनी थेट व्हिडिओ काढून आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

पुणे, सोलापूर, मुंबई आणि जालन्यात बोगस मतदार पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः सोलापुरात कर्नाटकमधून गाड्या भरून मतदार आणल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. या प्रकरणामुळे सीमावर्ती भागातील मतदान यंत्रणेवर पुन्हा एकदा संशयाची सावली निर्माण झाली आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 मध्येही मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना पुणे शहरप्रमुख आणि उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी महादेववाडी-उंड्री परिसरात खासगी वाहनातून ग्रामीण भागातील लोकांना मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. उंड्री चौकात स्वतः उपस्थित राहून त्यांनी बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला असून, संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भानगिरे यांनी सांगितले की, शहरातील प्रभागात बाहेरून लोक आणून मतदान करवून घेण्याचा प्रकार लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. “मतदान ही नागरिकांची जबाबदारी आहे, ती विकत घेण्याचा किंवा बळकावण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, मतदारांच्या नावांमध्ये घोळ आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या नियोजनामुळे मतदारांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी मतदारांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे.
लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारचे गैरप्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर निवडणुकीच्या पारदर्शकतेवर कायमचा डाग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







