पुणे: पुण्यात जमीन आणि भूखंडाच्या व्यवहाराच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. कात्रज परिसरात जमीन खरेदीत गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागपूर येथील एका व्यावसायिकासह त्यांच्या परिचितांकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य भारत गायकवाड (वय 33, रा. सुनीतानगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आणि आरोपीची जुलै 2023 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर आदित्य गायकवाड याने कात्रज परिसरातील जमीन खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तक्रारदारांसमोर ठेवला. या गुंतवणुकीत मोठा आणि दरमहा निश्चित आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून त्याने तक्रारदारांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्यांच्या काही परिचितांनी मिळून एकूण अडीच कोटी रुपये गुंतवले. सुरुवातीला आरोपीने ठरल्याप्रमाणे काही प्रमाणात आर्थिक परतावा दिला. त्यामुळे तक्रारदारांचा त्याच्यावर अधिक विश्वास बसला. मात्र काही काळानंतर आरोपीने परतावा देणे बंद केले. गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने तक्रारदारांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नांदेड सिटी परिसरात भूखंड विक्रीच्या नावाखाली 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमनाथ तानाजी रजपूत आणि गणेश बाबूराव गरूड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराला नांदेड सिटी परिसरातील एक भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून तो दाखवण्यात आला. संबंधित भूखंडाचा व्यवहार एक कोटी 40 लाख रुपयांना ठरवण्यात आला होता. व्यवहारातील पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराने 32 लाख रुपये दिले. त्यानंतर भूखंडाच्या विक्री व्यवहाराला मान्यता मिळाल्याचे दर्शवणारे पत्र देण्यात आले. पुढील चौकशीत हे पत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचाही पुढील तपास सुरू आहे.







