डॉ. अशोक बालगुडे

पुणे : मराठीला केवळ अभिमानाची भाषा न ठेवता ज्ञान, शिक्षण आणि रोजगाराची भाषा करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक खासगी, अभिमत विद्यापीठ तसेच खासगी महाविद्यालयात मराठी विभाग सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू व कुलसचिवांच्या बैठकीत पाटील यांनी ही माहिती दिली. शिक्षणासाठी परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना मराठीचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात मराठी विभाग कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठीला ज्ञानभाषा आणि रोजगारभाषा बनविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. राज्यातील सुमारे 260 बोलीभाषांपैकी पहिल्या टप्प्यात 100 बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
दरम्यान, साहित्य संमेलनाशी युवा पिढीला जोडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे नियोजन असल्याची माहिती समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली.
मराठी टिकवायची असेल तर ती घरापुरती नव्हे, तर विद्यापीठ, ज्ञान-विज्ञान आणि रोजगाराच्या क्षेत्रातही सक्षम करावी लागेल; प्रस्तावित निर्णयाची खरी कसोटी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत असेल.







