पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत MPSC मुख्य परीक्षा २०२५च्या निकालाचे रिचेकिंग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२५च्या मुलाखतींनाही तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुनर्तपासणीनंतर निकाल पुन्हा जाहीर केला जाणार आहे.

पुण्यात MPSCच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. बैठकीत मुख्य परीक्षा २०२५च्या निकालाची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही तपासणी दळवी समितीच्या शिफारशींच्या आधारे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मुलाखतींमध्ये उमेदवारांना असमान पद्धतीने जास्त गुण मिळू नयेत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीसमोर विद्यार्थ्यांना आपले प्रश्न आणि तक्रारी मांडता येणार आहेत. तसेच आरटीआयअंतर्गत मागविलेल्या उत्तरपत्रिका आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

आंदोलक निखिल पाटील यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेबाबत पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.







