पुणे : दिवाळी आणि छठपूजेसाठी गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या पुणेकरांना यंदा रेल्वे आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच अनेक गाड्यांमधील उपलब्ध जागा संपत असून, त्यानंतर तिकीट बुकिंगमध्ये ‘रिग्रेट’ किंवा ‘नो रूम’ असा संदेश दिसत आहे. त्यामुळे विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली आहे.

नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह उत्तर आणि पूर्व भारतातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. दिवाळीनिमित्त कुटुंबासह गावी जाण्यासाठी दानापूर, पाटणा, गोरखपूर, नागपूर, अमरावती तसेच कोकण आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना मोठी मागणी असते. यंदाही या मार्गांवरील गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटांत जागा उपलब्ध नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वेने १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवस केला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातील आरक्षणावर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे. एखाद्या गाडीतील आरक्षित जागा आणि प्रतीक्षा यादीची निर्धारित मर्यादा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवाशांना तिकीट मिळत नाही. अशावेळी संबंधित गाडी आणि श्रेणीसमोर ‘रिग्रेट’ किंवा ‘नो रूम’ असा संदेश दिसतो.

आरक्षण न मिळाल्याने प्रवाशांना तत्काळ तिकीट, खासगी बस किंवा विमानप्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. मात्र सणासुदीच्या काळात खासगी बसचे भाडे वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या खर्चात मोठी वाढ होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर पुणे आणि हडपसरहून दानापूर, गोरखपूर, नागपूर, अमरावती तसेच कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. नियमित गाड्यांना अतिरिक्त डबे जोडावेत, विशेष गाड्यांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे आणि आरक्षण प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.






