पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत (Pune Politics) घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उमेदवार माघारी घेतल्याच्या निर्णयावर त्यांनी उघडपणे संताप व्यक्त करत हा महाविकास आघाडीवरील विश्वासघात असल्याचा आरोप केला. (Sharad Pawar)

वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा विश्वासघात पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा झाल्याचा दावा केला. पुण्यातील राजकीय घडामोडींमध्ये सर्व काही आधीच ठरलेले होते, असा आरोप करत त्यांनी ही निव्वळ राजकीय सेटलमेंट आणि भाऊबंदकी असल्याचे म्हटले. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत समन्वय असल्याचा आरोप करत मोरे म्हणाले की, त्याचा फटका महाविकास आघाडीला बसत आहे. आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता घेतले जाणारे निर्णय स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीत राहण्याबाबत फेरविचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे भूमिका मांडल्याचे सांगत मोरे म्हणाले की, पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी सूचना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना केली आहे. सतत अशा प्रकारे आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र राजकीय गणिते जपली, तर त्याचा परिणाम भविष्यातील निवडणुकांवर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
महाविकास आघाडी टिकणार की नाही, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगतानाच अशा घडामोडींमुळे आघाडीची एकजूट कमकुवत होत असल्याची खंतही वसंत मोरे यांनी व्यक्त केली.







