पुणे: सध्या सुरू असलेल्या महापालिका (Mahapalika Election) निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने जोरदार मुसंडी मारत बिनविरोध नगरसेवकांच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप आणि महायुतीचे एकूण 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, महापालिकांच्या पातळीवर (BJP) भाजपाने नवा विक्रम केल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने पक्षाची ताकद अधोरेखित झाली आहे. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकांच्या सद्य टप्प्यात भाजपाचे 8 महापालिकांमध्ये एकूण 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रामुख्याने समावेश असून, येथे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या महापालिकांमध्येही भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. अनेक प्रभागांमध्ये विरोधकांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील या राजकीय यशामागे देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता आणि रविंद्र चव्हाण यांची संघटनात्मक रणनीती कारणीभूत ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकांमध्येही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरू लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान, भाजपानंतर शिवसेनाचे 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. बिनविरोध निवडींच्या या आकडेवारीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजप आणि महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.







