पुणे, ता. २४ : प्रेमसंबंधातून मानसिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय तरुणीने मुळा-मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा प्रेमसंबंध, फसवणूक आणि मानसिक छळाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.
निकिता चारुदत्त आष्टेकर (वय २३, मूळ रा. माढा, जिल्हा सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. चैतन्य संजय कानडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निकिताचा भाऊ निखिल चारुदत्त आष्टेकर (वय 22, रा. सन्मती नगर, वैराग रोड, ता. माढा जि. सोलापुर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आष्टेकर ही शिक्षण पूर्ण करून पुण्यात नोकरीसाठी आली होती. झेन्सार आयटी पार्क परिसरातील कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख नातेवाईकांतील चैतन्य संजय कानडे याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघेही विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे निकिताने कुटुंबीयांना सांगितले होते.
दरम्यान, काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ४ मे रोजी रात्री निकिताने तिच्या भावाला मेसेज करून “त्याने माझा वापर करून मला सोडून दिले,” असा गंभीर आरोप केला होता. तसेच “लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केली,” असेही तिने मेसेजमध्ये नमूद केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या संभाषणाचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आले आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी निकिताने पुन्हा भावाला “चैतन्यशी बोल” असा मेसेज केला होता. मात्र त्याच दिवशी दुपारी खराडी पोलिसांनी कुटुंबीयांना फोन करून निकिताने मुंढवा पुलाजवळील मुळा-मुठा नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी तिचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे आष्टेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, “प्रेमाच्या नावाखाली मानसिक छळ सहन करावा लागल्यानेच निकिताने टोकाचे पाऊल उचलले,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
खराडी पोलिसांनी चैतन्य संजय कानडे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मोबाइल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडियावरील संभाषणांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेमुळे तरुणाईतील नातेसंबंध, मानसिक ताण आणि सोशल मीडियातून वाढणारे भावनिक संघर्ष पुन्हा चर्चेत आले आहेत.






