पुणे: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्यात आले असून हे पेपर विक्रीसाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजीव प्रयाग शाम (45, पटना – बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (30, पटना – बिहार) आणि धीरज बलराज सिंग (28, पानीपत – हरियाणा) यांचा समावेश आहे. या तिघांना 27 जून रोजी अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट आणि एटीएम कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, भारत आणि नेपाळचे चलन, रोख रक्कम, बँकेचे धनादेश, प्रेस आयडी कार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या रॅकेटमधील कपिल दहिया आणि बिजेंदर कुमार हे दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे बिहार, हरियाणा, दिल्ली, आग्रा आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे गुन्हे शाखेमार्फत डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक संपूर्ण रॅकेटचा तपास करत आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची माहिती सभागृहात देताना भविष्यात टीईटीसह इतर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच हे संघटित रॅकेट असल्याचा प्राथमिक संशय असल्याने आरोपींवर मकोका लागू करण्याबाबतही कायदेशीर पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.







