पुणे: पुण्यातील सारथी संस्थेतर्फे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील आसनव्यवस्थेवरून भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावेळी माधुरी मिसाळ किंवा इतर मंत्री आले नव्हते. त्यामुळे त्या जागा रिकाम्या होत्या. अभिमन्यू पवार यांना पहिल्या रांगेत बसायचं होतं, म्हणून ही धावाधाव सुरू होती.”

त्या पुढे म्हणाल्या, “सारथीच्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्यावं, अशी माझी इच्छा होती. कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार आहेत. मात्र, अभिमन्यू पवार यांना स्वतः पुढे बसायचं होतं.”
मेधा कुलकर्णी यांनी आणखी आरोप करत म्हटलं, “हा कार्यक्रम मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सारथी संस्थेचा होता. मी चांगल्या भावनेने कार्यक्रमाला गेले होते. मात्र, माझ्या जातीला चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊन गालबोट लावण्याचं काम करण्यात आलं. अभिमन्यू पवारांनी मला हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसू नका, कारण त्यामुळे वाद होईल, असं सांगितलं. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे, एका जातीचा नाही. शासकीय प्रोटोकॉलनुसार आसनव्यवस्था केली जाते, जातीनुसार नाही.”
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मी मेधाताईंना एवढंच सांगितलं होतं की, नरेंद्र पाटील पुढे बसतील कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू. यात कुठल्याही जातीचा विषय नव्हता.”
पवार पुढे म्हणाले, “हा कार्यक्रम माझ्या घरचा नव्हता. मेधाताई माझ्या वरिष्ठ आहेत आणि माझ्या नेत्या आहेत. माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र कार्यक्रमातून बाहेर पडायचं की थांबायचं, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”







