पुणे: महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरचा (Bhimashankar) लवकरच कायापालट होणार आहे. राज्य सरकारने सहा प्रमुख (Devendra Fadanavis) तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मोठ्या निधीची घोषणा केली असून त्यामध्ये भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी 172 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून भाविक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभारण्यात येणार असून परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल होणार आहेत. (Latest Marathi News)

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी, पार्किंगची अडचण आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या 2.7 मीटर रुंदी असलेले रस्ते आता 7 मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या आराखड्यानुसार भीमाशंकर येथील बस स्थानक अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. तसेच वाहनांसाठी पार्किंग सुविधा उभारली जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर तयार करण्यात येणार आहे. याशिवाय 257 केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.
सुरक्षेच्या दृष्टीने नव्या पोलीस स्थानकाचे बांधकाम तसेच भाविकांसाठी विश्रामगृह उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, रोपवे सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास आणि राजापूर येथे नवीन पर्यटन सुविधा निर्माण करण्याचेही नियोजन आहे.
या सर्व कामांसाठी आवश्यक भूसंपादन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मे 2027 पर्यंत सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून भाविक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.







