पुणे: महिन्याचा शेवटचा आठवडा, खर्चाचा (Bank Holiday) ताण वाढलेला, लग्नसराईमुळे घराघरांत पैशांची गरज जास्त असलेला काळ आणि त्यातच जर सलग चार दिवस (Bank News) बँकेची दारे बंद राहिली तर सामान्य ग्राहकांची अडचण वाढणार, हे नक्की. येत्या काही दिवसांत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, बँक व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. (Latest Marathi News)

यामागची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. बँक कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. देशभरातील 9 प्रमुख बँक संघटनांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ही मागणी पुन्हा जोरात लावून धरली आहे. कामाचा ताण वाढत असताना कुटुंबासाठी वेळ मिळत नाही, असा कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे. रिझर्व्ह बँक, एलआयसी आणि शेअर बाजार पाच दिवस चालतात, मग बँक कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस सुट्टी का नाही, असा थेट सवालही उपस्थित केला जात आहे. यासाठी कर्मचारी सोमवार ते शुक्रवार दररोज सुमारे 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अंतिम निर्णय आरबीआय आणि केंद्र सरकारच्या पातळीवर अडकल्याने अस्वस्थता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग सुट्ट्यांचा योग जुळून आला आहे. 24 जानेवारी हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील, 25 जानेवारी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची अधिकृत सुट्टी आहे आणि जर मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 27 जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात चार दिवस बँक व्यवहार ठप्प राहू शकतात.
याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसू शकतो. चेक क्लिअरन्स लांबू शकतो, कर्जविषयक किंवा केवायसीसारखी कामे रखडू शकतात. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये रोकड कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश डिजिटल सेवा सुरू राहिल्या तरी सर्व्हरवर ताण आल्यास ऑनलाईन व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अत्यावश्यक बँक कामे आधीच उरकणे आणि हातात थोडी रोख रक्कम ठेवणे, हेच पुढील काही दिवसांसाठी शहाणपणाचं ठरणार आहे.







