राहुल अवचट
दौंड : महाराष्ट्र सरकारने केलेल्या वीज बिल दरवाढीविरोधात आणि सुरक्षा ठेव (Security Deposit) वाढवण्याच्या निर्णयाविरोधात दौंड शहरात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला. शासनाने नव्याने केलेली ही दरवाढ आणि सुरक्षा ठेव यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. याविरोधात दौंडमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निषेध मोर्चा काढला आणि वीज बिले जाळून आपला संताप व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस तसेच नागरिकांनी एकत्र येत या दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान, दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन दौंड महावितरणच्या उपअभियंता यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शिवसेनेचे अनिल सोनवणे, शहर प्रमुख आनंद पळसे, काँग्रेस अध्यक्ष हरेश ओझा , महेश जगदाळे, अमोल आवारे, अमित पवार, प्रथमेश चव्हाण, प्रकाश सोनवणे , रजाक शेख, मिलिंद संसारे, सुरेश शिरसागर यांसह महाविकास आघाडी व घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.







