लोणी काळभोर, (पुणे) : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस लाईनच्या कामामुळे कुंजीरवाडी परिसरातील नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कामादरम्यान पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन आणि जलजीवन योजनेची लाईन नुकसानग्रस्त झाल्यानंतरही तब्बल दीड महिन्यांपासून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा माजी सरपंच सचिन तुपे यांनी केला आहे.

कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ गॅस लाईनच्या कामादरम्यान मोठा खड्डा पडला असून तो अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. “प्रशासनाने सुरुवातीला काही दिवस हे काम थांबवले होते. मात्र त्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले. या कामामुळे नुकसान झालेल्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन्सची दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे,” याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे.

पुढे बोलताना तुपे म्हणाले, “फुटलेल्या लाईन्समुळे परिसरात दूषित पाणी साचत असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
दरम्यान, “नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा सवाल उपस्थित करत तुपे यांनी पुढील आठ दिवसांत खड्डा बुजवून सुमारे 500 मीटरपर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या सर्व लाईन्स पूर्ववत कराव्यात, अन्यथा कुंजीरवाडी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना कुंजीरवाडीच्या ग्रामपंचायत अधिकारी सविता भुजबळ म्हणाल्या, “संबंधित कामाला वाहतूक विभागाने परवानगी दिलेली आहे. त्या कामाच्या परवानगीशी ग्रामपंचायतीचा काडीमात्रही संबंध नाही. गॅस लाईनचे काम करताना पाईपलाईन फुटल्या असतील, तर त्यासाठी संबंधित ठेकेदार जबाबदार असेल. या प्रकरणी आम्ही वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत. ठेकेदाराने नुकसानग्रस्त लाईन्सची दुरुस्ती केली नाही, तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी करू. दुसरे म्हणजे, सचिन तुपे यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. स्वामी समर्थ मंदिराजवळ गॅस लाईनच्या कामामुळे मोठा खड्डा पडल्याची माहिती त्यांनी आजच दूरध्वनीवरून दिली आहे. त्यानुसार संबंधित बाबींची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.”






