Pune Politics : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आहे. अजित पवार यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की, ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये बसलो आहे. सिंचन घोटाळ्याचा दाखला देत त्यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहायला हवं. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील पक्षावर आरोप करत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली, तर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे. सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे अनेक मुद्दे उघड होत असल्याचं चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली पिंपरी-चिंचवड आज कर्जात कशी गेली, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. महापालिकेच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या. त्या पैशातून नेमकी कोणती कामं झाली, हे सत्ताधाऱ्यांनी जनतेला दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं. (Pune Politics)
या आरोपांना उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं की, आरोप कसे करायचे याचं भान ठेवायला हवं. अजित पवार यांनी आधी स्वतःकडे पाहावं आणि भाजपवर बोलताना विचारपूर्वक वक्तव्य करावं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.







