पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत अखेर ज्याची भीती व्यक्त केली जात होती, तेच घडले. ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चौथ्या दिवशी एकाचवेळी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर पोहोचली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली होती. मोशी कचरा डेपोजवळील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाची तीन मजली इमारत कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने जमीनदोस्त झाली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि विविध यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.

शनिवारी (११ जुलै) संध्याकाळी ढिगाऱ्याखालून सलग सहा जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर सर्वांना मृत घोषित केले.

मृतांची नावे
-अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
– सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
– सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी)
– महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर)
– नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी)
– रणजीत पाटील (वय २२, मोशी)
– भावेश वाणी (वय ३३, निगडी)
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोशी कचरा डेपोला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील विषारी वायूमुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अद्याप काही जणांचा शोध सुरू असून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
या भीषण दुर्घटनेनंतर कचरा डेपोतील सुरक्षा व्यवस्था, प्रकल्पाची रचना आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







