पुणे : पुण्यातील गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा परदेशात पळून गेल्याची माहिती आहे. त्याने खोटा व्हिसा तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस त्याला अटक करण्यासाठी सगळीकडून प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना शस्त्र परवाना कसा मिळाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घायवळ कुटुंबातील दोन्ही करते पुरुष अडचणीत सापडल्यानंतर त्यांचे आई-वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले असून, धक्कादायक आरोप केले आहेत.
निलेश घायवळच्या आईचे आरोप काय?

निलेश घायवळच्या आई कुसुम घायवळ म्हणाल्या, “राजकीय विरोधक दोन्ही भावांना जगू देत नाहीत. निलेशभाऊ लंडनला गेले तेव्हा मी स्वतः त्यांना वाटी लावलं. खोटा व्हिसा असता तर विमानात चढू दिलं असतं का? त्याच्यावरील सर्व केस रद्द झाल्या आहेत, मग आता पुन्हा गुन्हा दाखल का? त्याने पिस्तूलचा धाक दाखवून १२ फ्लॅट घेतले म्हणतात घेतले म्हणतात. पण हे करत असताना लोक झोपले होते का? पोलिस घरी येतात आणि काहीही बोलतात. सारखे म्हणतात निलेश पळून गेला. पोलीस खोटं बोलतात. माझं कॅन्सरचं ऑपरेशन झालं, आठ दिवस झाले आम्हाला काहीच समजत नाही. माझी मुलं सुधरत होती. निलेशला राजकारणाचं वेड होतं, तर सचिन गेली ३५ वर्ष शिक्षक आहे. मी त्यांची आई आहे, मी खोटं का बोलेन? सर्वजण त्याला फसवत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, “मित्रांच्या संगतीमुळे निलेश थोडा गुन्हेगारीकडे वळला होता, पण त्यातून बाहेर पडला. सगळं नीट सुरू होतं. सोनेगावातून दोघांपैकी एकाला निवडणूक लढवायची होती. लोक त्याला गुंड म्हणतात, पण त्याच्या कपाळावर काय ‘गुंड’ लिहिलं आहे का? माझं लेकरू गुंड नाही, तुम्हीच त्याला गुंड बनवलंत.”
जर निलेशने खोटा व्हिसा काढला असता, तर तो परदेशात कसा गेला असता?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत “राजकारण्यांनी निलेशचा वापर केला,” असा आरोप केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही भावांना निवडणूक लढवायची होती. त्यामुळे त्यांना खच्ची करण्याचा विरोधकांचा कट असल्याचं घायवळ कुटुंबाचं म्हणणं आहे.







