पुणे: देशभरात चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणाच्या तपासात आता नवे धागेदोरे समोर येत आहेत. हरयाणा आणि राजस्थानपासून सुरू झालेल्या (Shivraj Motegaonkar) या प्रकरणाचा तपास महाराष्ट्रापर्यंत पोहोचला असून लातूर, पुणे आणि नांदेडसारख्या शहरांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपासाची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आता तपास यंत्रणांनी मागील 365 दिवसांच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी 19 जण तपासाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)
या प्रकरणात शिवराज मोटेगावकर संचालित आरसीसी (रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे. तपासादरम्यान मागील वर्षाच्या शैक्षणिक नोंदी आणि संबंधित विद्यार्थ्यांची माहिती तपासली जात आहे. त्यामुळे या क्लासेसच्या कामकाजाबाबत अधिक चौकशी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी आरसीसी क्लासेसमधून 19 विद्यार्थी नीट परीक्षेत यशस्वी झाले होते. हे विद्यार्थी सध्या देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे. तपासाचा भाग म्हणून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाऊ शकते. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याच्या वर्षातील पेपरफुटीच्या तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याने तपास यंत्रणांनी मागील वर्षातील परीक्षा प्रक्रियेचीही पडताळणी सुरू केली आहे. विशेषतः आरसीसी क्लासेसमध्ये घेण्यात आलेल्या मॉक टेस्ट आणि त्या वर्षीच्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील साम्य तपासले जाणार असल्याचे समजते.
जर तपासात मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य आढळले, तर तपासाची व्याप्ती आणखी वाढू शकते. त्यामुळे हा प्रकार केवळ एका वर्षापुरता मर्यादित आहे की मागील वर्षांपर्यंत त्याचे धागेदोरे जातात, याचा तपास सुरू आहे.
मात्र या प्रकरणात सध्या तपास सुरू असून संबंधित व्यक्तींविरोधात अंतिम निष्कर्ष किंवा दोष निश्चित झालेला नाही. तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे शैक्षणिक क्षेत्रासह देशभराचे लक्ष लागले आहे.







