जुन्नर : “सरकारच्या हातात असताना, न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला?” अशा शब्दांत मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले. मुंबईच्या आझाद मैदानावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, आंतरवलीचे सरपंच पांडूरंग तारख, हनुमान मुळीक, ज्ञानदेव काशिद, गंगाधर काळकुटे, बद्रीनाथ तारख, संजय गोडसे, सत्यशील शेरकर, ज्ञानेश्वर खंडागळे, मकरंद पाटे, सूरज वाजगे, सकल मराठा समाजाचे गणेश महाबरे, संदेश बारवे, सुनिल ढोबळे, प्रवेश देवकर आदी उपस्थित होते. “एक मराठा लाख मराठा”च्या घोषणा देत आंदोलकांनी आरक्षण मिळवूनच दाखवू असा निर्धार व्यक्त केला.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंदोलक कार्यकर्ते शिवाई देवी मंदिरात पोहोचले. मनोज जरांगे यांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर त्यांनी शिवजन्मस्थळी नतमस्तक होऊन तेथील माती कपाळी लावली. यावेळी बोलताना त्यांनी, “आता ही लढाई आरपार असेल,” असा इशारा दिला.
पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, “गरीब मराठ्यांचा अपमान करू नका, त्यांची मने जिंका. सत्ता दिली मराठ्यांनी पण तुम्हीच उलटलात मराठ्यांवर. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी ही लढाई सुरू आहे. रायगड आणि शिवनेरी ही आमची प्रेरणास्थळे आहेत. इथून जे सुरू होतं, ते यशस्वी होतं हा इतिहास आहे. त्यामुळे मराठा विरोधी भूमिका सोडून द्या.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही आरक्षण मिळवणारच, आता थांबणार नाही. तुम्ही म्हणता एक दिवस उपोषण करा, पण मग एक दिवसात मागण्या का मान्य करत नाही? वारंवार आमचा अपमान होतो कारण मी मॅनेज होत नाही. छत्रपतींच्या विचारावर चालणारे सरकार, छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या मराठ्यांवर गोळ्या झाडणार का?”
आंदोलनामुळे गणेशोत्सवात अडथळा येतोय, या आरोपावर जरांगे म्हणाले, “अडथळा करायला आमच्या हातात बंदुका आहेत का? हिंदूंच्या सणाच्या वेळी आम्ही आंदोलन केलं तर तुम्ही लाठीचार्ज केला, ते चालतं, पण आता आम्ही हक्काची मागणी केली तर अडथळा म्हणता?” “गोळ्या झेलायला आम्ही तयार आहोत, पण आरक्षणासाठी मागे हटणार नाही. मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण द्यावे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.







