Karad Accident News : कराड : सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर यांना जोडणाऱ्या आंबेनाली घाटात गुरुवारी पहाटे भीषण अपघात (Accident) घडला. मुंबईहून परतत असलेली वॅगनआर कार बावली टोक आणि चिरेखिंड परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बचाव करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील लखवड गावातील संकपाल कुटुंब मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास आंबेनाली घाटातील बावली टोक आणि चिरेखिंड दरम्यान कारवरील नियंत्रण चालकाकडून सुटले. कार प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा रेलिंगला धडकली आणि त्यानंतर थेट खोल दरीत कोसळली. हा भाग अतिशय धोकादायक असल्याने अपघातानंतर परिसरात मोठी घबराट पसरली.
कार दरीत कोसळल्यानंतर वाहनातील प्रवाशांनी मदतीसाठी आवाज दिला. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी स्थानिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिक, प्रतापगड शोध आणि बचाव पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
बचाव पथकाने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून दोरीच्या मदतीने खोल दरीत उतरून जखमींपर्यंत पोहोचले. दरीचा भूभाग कठीण असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. सर्वात गंभीर जखमी व्यक्तीला प्रथम स्ट्रेचरच्या मदतीने वर आणण्यात आले. त्यानंतर इतर जखमींनाही काळजीपूर्वक वर काढून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
या अपघातात अजय सुनील संकपाल, तुकाराम संकपाल, सुनील संकपाल, पार्थ संकपाल आणि संगीता संकपाल हे जखमी झाले आहेत. सर्वजण महाबळेश्वर तालुक्यातील लखवड येथील रहिवासी आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अत्यंत धोकादायक परिस्थितीत दरीत उतरून बचाव कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.






