लोणी काळभोर : शेतीमाल एक्स्पोर्ट करण्याच्या (Hadapsar Fraud Scheme) नावाखाली हडपसर येथील पठ्ठ्याने मागील दोन वर्षापूर्वी (Pune News) एक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील हजारो शेतकऱ्यांची 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची बेकायदा माया गोळा केली आहे. याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार झाल्याने संबंधित महाठगाने दुसऱ्या कंपनीच्या नावावर जुना दामदुपटीचा खेळ सुरू केला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासनाने या संस्थेची साधी चौकशीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब माहिती आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे प्रशासन कारवाई का करत नाही याचे कारण आज समोर आले आहे. ते असे की, प्रशासनातील काही बड्या अधिकाऱ्यांनीसुद्धा टेबलाखालून मिळणारी मोहमाया दामदुप्पट करण्याच्या आमिषापोटी या संस्थेत गुंतवली आहे आणि जर या संस्थेवर कारवाई झाली तर आपला सुद्धा भांडाफोड होईल आणि आपली नावे व काळा पैसा समोर येईल. त्यामुळे ठगावर कारवाई करण्यापेक्षा ‘आळीमिळी गुपचिळी’ ची भूमिका संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
हडपसर येथील एका महाठगाने स्वत: कृषी आयुक्त असल्याची माहिती सर्वत्र पसरवली होती. त्यानंतर त्याने “एक्स्पोर्टमध्ये बक्कळ पैसा मिळतो, तुम्हाला प्रतिमाह 10 टक्के परतावा देतो” असे आमिष दाखवून संबंधित पठ्ठ्याने पुणे, नगर, नाशिक, सोलापूरसह बाराहून अधिक जिल्ह्यातील गुंतवणूकदरांची संख्या 4 हजाराहून अधिक असून, वरील गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम 4 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. असे त्याने स्वत: एका व्हिडीओ क्लीपद्वारे जाहीर केले आहे.
संबधित पठ्ठ्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनातील मोठमोठे अधिकारी, राजकीय नेते यांच्याशी ओळख असून थेट संबंध असल्याचे व्हिडीओच्या माध्यामातून दाखविले आहे. या झगमगाटीला सर्वसामान्य गुंतवणूकदार भुलले असून त्यांनी या बोगस संस्थेमध्ये हजारो कोटींची अवैध गुंतवणूक करून घेतली आहे. तसेच संस्थेला अतिरिक्त भांडवलाची गरज असल्याचे सांगून प्रशासनातील अधिकारी व व्यावसायिकांनादेखील जादा परताव्याचे गाजर दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडले आहे. संबधित ठगाच्या फतव्याला अधिकारीवर्ग देखील फसला आहे. परंतु, त्यांनी डोके चालवून टेबलाखालून मिळणारी माया यात गुंतवली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान,संबंधित संस्थेची तक्रार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे या संस्थेच्या चौकशीचे आदेश कधीही येऊ शकतात. त्यामुळे आपणही या प्रकरणात अडकणार असल्याने अनेक अधिकाऱ्यांची देखील घाबरगुंडी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी अधिकाऱ्यांनी ‘तेरी भि चूप मेरी भि चुप’ अशी भूमिका स्वीकारली आहे.
दोन महिन्यांपासून परतावा बंद
हडपसर येथील पठ्ठ्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वात प्रथम 10 टक्के परताव्याचे आमिष दाखविले आहे. मात्र आता गुंतवणुकीचा वेग कमी होऊन परताव्याचा मागणी वाढली आहे. त्यामुळे या ठगाने इतर घोटाळयाप्रमाणे चाल ढकल पुढे केली आहे. गुंतवणूकदारांना मागील दोन महिन्यांपासून परतावा मिळालेला नाही. गुंतवणूकदरांचे वारंवार फोन येत असल्याने फोन नंबर बदलला आहे आणि जर या क्रमांकावर जवळच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचा फोन आला तर तो उचलला जात नाही. थोड्या वेळाने फोन करतो असा मेसेज पाठविला जातो. परंतु, पुन्हा परत कधीच फोन येत नाही.
संबंधित महाठग आजारी असल्याचे कारण देत असल्याने गूंतवणूकदार हवालदिल
” पुणे प्राईम न्यूज”ने या फसव्या स्कीमबाबत आवाज उठवल्याने नव्याने होणारी फसवणूक व गुंतवणूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. त्यामुळे महाठगाचे आर्थिक गणित कोलमडल्याने तीन तेरा वाजले आहेत. त्यातच काही नागरिक गुंतवणूक केलेली मुद्दल परत मागू लागल्याने महाठग आजारपणाचे सोंग घेऊन आजारी पडला आहे.







