पुणे: पुणे शहराच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) 2025-26 या वर्षासाठी शहराची लोकसंख्या 81 लाख 64 हजार 868 गृहीत धरून तब्बल 21.03 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने केवळ 14.61 टीएमसी पाणीच मंजूर केल्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पुढील वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेला मोठे नियोजन करावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाकडून पालिकेला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 11.50 टीएमसी, पवना धरणातून 0.34 टीएमसी, आणि भामा-आसखेड जलाशयातून 2.67 टीएमसी पाणी मिळणार आहे.

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये पुणेकरांनी जवळपास 22 टीएमसी पाण्याचा वापर केला होता. यामुळे महापालिका अपेक्षेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे स्पष्ट होते.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसारच पुणे पालिकेचा कोटा निश्चित करावा, अशी मागणी केली जात आहे. जूनपर्यंत पालिकेने वापरलेले पाणी विचारात घेतले तर एकूण वापर केवळ 12 टीएमसी इतकाच राहतो, असेही म्हटले जात आहे.







