विशाल शिंदे

नसरापूर : नसरापूर येथील वनश्री सोमनाथ उकिरडे या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धनंजय दशरथ दसवडकर (रा. आस्कवडी, ता. राजगड) यांच्याविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात तब्बल दहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या सासऱ्यांचे, मधुकर रामचंद्र उकिरडे यांचे कापूरव्होळ (ता. भोर) येथे दुकान गाळे आहेत. त्यापैकी दोन गाळे धनंजय दसवडकर यांना भाड्याने देण्यात आले होते. भाड्याची थकबाकी फेडण्यासाठी दसवडकर यांनी मधुकर उकिरडे यांना कोरे धनादेश दिले होते. हे धनादेश परत मिळावेत या कारणासाठी दसवडकर यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री नऊच्या सुमारास उकिरडे यांच्या घरी भेट दिली. मात्र, त्या वेळी मधुकर उकिरडे घरी नसल्याने त्यांचा मुलगा सोमनाथ आणि सुन वनश्री उकिरडे यांना त्यांनी चेक परत देण्याची मागणी केली.

उकिरडे दांपत्याने सांगितले की दुकानाचा व चेकसंबंधीचा व्यवहार सासऱ्यांशी संबंधित आहे. मात्र, दसवडकर यांनी दबाव आणून “मी चेक घेतल्याशिवाय जाणार नाही, नाहीतर गळ्यातील सोन्याचे गंठण द्या,” अशी धमकी दिली. यावर विरोध होताच दसवडकर यांनी महिलेच्या गळ्यातील 53 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 1 लाख 17 हजार 612रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावले. आणि “माझे चेक मिळाल्याशिवाय हे गंठण परत करणार नाही. व पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हा दोघांना जीवे मारीन,” अशी धमकी दिली.
ही घटना 11 नोव्हेंबर 2024 रोजी घडली. मात्र, भीतीमुळे पीडित दांपत्याने 31 जानेवारी 2025 रोजी पोस्टाद्वारे राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज पाठवला. परंतु त्याची दखल न घेतल्याने पीडितांनी 10 जुलै रोजी पोलिस अधिक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महिला आयोग यांच्याकडे तक्रार केली. अखेर दबाव आल्यानंतर 2 ऑगस्ट 2025 रोजी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीचे पती सोमनाथ उकिरडे यांनी आरोप केला की, “गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर अद्याप कारवाई झालेली नाही.”
या संदर्भात तपास अधिकारी पोलिस हवालदार अजित माने (राजगड पोलिस ठाणे) यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासाआधी कागदपत्रे व पुरावे सरकारी अभियोक्ता, शिवाजीनगर, पुणे यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.”
दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर नसरापूर व राजगड परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले असून, पीडित दांपत्याला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







