बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेलसमोर पेविंग ब्लॉकचे काम सुरू असताना, हॉटेलमध्ये आलेल्या गाड्या बाजूला लावण्यासाठी सांगितलेल्या कारणावरून सात ते आठ जणांकडून हॉटेल मालकासह कामगारांनाही लाकडी दांडके आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भिवरी येथे घडली होती. यामध्ये हॉटेलच्या काचा फोडून गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन त्या ठिकाणावरून हल्लेखोर फरार झाले होते. या प्रकरणातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भिवरी निसर्ग हॉटेलचे मालक अनिकेत कटके व कैलास वांढेकर यांच्यावर दत्ता शेलार, गणेश पवार व त्यांच्या इतर पाच अनोळखी साथीदारांनी दांडक्याने व लोखंडी हत्यारांनी हल्ला केला होता. हॉटेलचे नुकसान करून, काऊंटरमधून 18 हजार 300 रुपयांची जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपींविरुद्ध अनिकेत कटके यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
जखमी कैलास वांढेकर यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरु आहेत. आरोपी प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार, भालचंद्र उर्फ गणेश शरद पवार, अर्जुन महादेव शेलार, विशाल चव्हाण, शुभम जाधव व दोन बालक यांनी हे कृत्य केले असून, त्यापैकी गुन्ह्यातील आरोपी प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार(रा. भिवरी), बालचंद्र उर्फ गणेश शरद पवार (रा. सासवड), अर्जुन महादेव शेलार(रा. भिवरी), व दोन बालक हे लातूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, तपास पथकाचे अधिकारी गणेश पाटील, जब्बार सय्यद, गणेश पोटे, तुषार लोंढे यांनी लातूर या ठिकाणी जाऊन गोपनीय पद्धतीने या आरोपींना पकडण्यात आले. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. या तीन आरोपींना व दोन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. व दोन बालकांना बाल सुधार गृह येरवडा पुणे येथे हजर केले आहे. बाकी अजून दोन आरोपींचा शोध चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.