Election : राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू असून मतदान संपण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. मतदानानंतर दुबार मतदान टाळण्यासाठी मतदारांच्या बोटावर अमिट शाई लावली जाते. ही शाई साधारणतः २० दिवस टिकते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा लावण्यात आलेली शाई अमिट नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Election)

थीनर, नेलपेंट रिमूव्हर, सॅनिटायझर किंवा ऍसिटोनचा वापर केल्यास बोटावरील शाई अगदी सहज निघून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुबार मतदानाचा गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील धायरी परिसरात मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण मतदान केंद्राच्या बाहेर केमिकलची बाटली घेऊन मतदारांच्या बोटावरील शाई पुसत होता. एका महिलेच्या बोटावरील शाई पुसताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडले. यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती असून काही काळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात बोटावरील शाई उघडपणे पुसली जात असल्याचे स्पष्ट दिसते. “आम्ही या तरुणाला रंगेहात पकडलं. त्याला सोडवण्यासाठी काही जण आले आणि ‘हा आमचा माणूस आहे’ असा दावा केला. त्या तरुणाच्या डोक्यावर भाजपची टोपी होती आणि त्याला वाचवायला आलेले लोकही भाजपचेच होते,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या कार्यकर्त्याने केला आहे.
“दुबार मतदान रोखण्यासाठीच बोटावर शाई लावली जाते. मग ती शाई पुसण्याचं कारण काय? केमिकल कशासाठी वापरायचं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणी पोलीस तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शाईच्या दर्जाबाबत आणि मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून निवडणूक यंत्रणेने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.







