दौंड (पुणे): शेतातील कांदा काढण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू असून कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे व अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

दौंड तालुक्यातील अनेक भागात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने व अवकाळी पावसाच्या भितीने शेतकर्यांनी मजुराची वाट न पाहता घरातील लहान मोठ्या सर्व सदस्यांना घेऊन कांदा काढणीची सुरूवात केली आहे. एकीकडे कांद्याला फक्त 10 ते 16 रुपये बाजारभाव असून हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यात भर की काही अवकाळी पावसाची गर्जना व कांदा काढणीसाठी मजूरच मिळत नाहीत. त्यात काढलेला कांदा घरापर्यंत आण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे साधनाचा अभाव आहे. यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

चाळी तयार करून कांद्याची साठवण
कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत कांद्याची रोपे, कांद्याची लागवड, खुरपणी, फवारणी, खते यासाठी शेतकर्यांनी वारेमाप पैसे खर्च करून कांदा पीक घेतले आहे. सुरुवातीचं हवामान कांद्याला पोषक असल्याने कांद्याचे पीक जोमदार आले. मात्र, ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. काढलेला कांदा भिजल्यामुळे चाळीत किती दिवस टिकतो, याची शास्वती नसताना सुद्धा अनेक शेतकरी बाजारभावाअभावी पैसा खर्च करून चाळी तयार करून कांद्याची साठवण करीत आहेत.
कांदा पावसाने भिजल्याने शेतात पडून
अनेकांचा तर कांदा पावसाने थोडाफार भिजल्याने तसाच शेतात पडून आहे. तर काहींनी काढलेला कांदा प्लास्टीकच्या साह्याने झाकून ठेवला आहे. कारण हा कांदा भरण्यासाठी मजूर मिळेनात, मिळाले तर दुसऱ्या दिवशी येतील की नाही याची शाश्वती नाही. कांदा काढणीसाठी अवाच्या सव्वा मजुरी द्यावी लागत आहे. कारण, सर्वत्र कांदा काढणी सुरू असल्याने 500 ते 600 रुपये एका दिवसाची मजुरी द्यावी लागत आहे. शिवाय कामगारांना छत्री व थंड पाण्याचा जारसुद्धा द्यावा लागत आहे. मजुरांना ने-आण करण्यासाठी पिकअपची सोय करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे
मागील आठ दिवसांपासून दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण तयार होते. अधूनमधून ढगांचा गडगडाटही होतो. त्यामुळे कांदा काढणी करणार्या शेतकर्यांच्या काळजीत भर पडत आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने काही शेतकरी कांदा लवकर काढत आहेत. तर काही शेतकरी अवकाळी पावसामुळे नुकसान होण्यापेक्षा आणि बाजार उतरले असले, तरी निदान भांडवलाचे पैसे तरी मिळतील, ह्या अपेक्षेने कांदा जमेल तशी विक्री करत आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कांदा काढणीचे नियोजन करत आहे. पण मजुर मिळेना. त्यात मागील दोन दिवसात मजूर मिळाले तर एकरी कांदा काढणीसाठी 14 हजार रुपये मजुरी दर द्यावा लागला. तसेच काठलेला कांदा उचलायला अधिकचा 600 रुपये मजुरी दर द्यावा लागतोय. त्यात कांद्याचे दर पडलेले असल्याकारणाने कांदा चाळीत साठवणूक करावी लागत आहे. त्यामुळं अधिकच खर्चात वाढ झालीय. कांदा लावण्यापासून ते काढण्यापर्यंत खर्च पाहिला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
– विजय शेलार, कांदा उत्पादक शेतकरी (पिंपळगाव)







