Satara ZP Election : सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेसाठी एकूण 65 गटांमध्ये तर 11 पंचायत समित्यांअंतर्गत 130 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आता या निवडणुकांमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता येणार, हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी 67.80 टक्के मतदान झाले आहे.

सातारा तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक झाली असून येथे 62.42 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आल्याने त्यांना अनुकूल वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यांना मनोज घोरपडे आणि महेश शिंदे यांचा पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक प्रचार साध्या पद्धतीने पार पडला. मोठ्या प्रचारसभा झाल्या नाहीत. मात्र पदयात्रा, कोपरासभा आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांनीही उमेदवारी केली आहे. कराडच्या येळगाव गटातून उदयसिंह पाटील रिंगणात होते, तर त्यांच्या विरोधात आनंदराव पाटील अपक्ष म्हणून उभे होते. औंध गटातून भारती गोरे यांनी निवडणूक लढवली असून त्यांच्यासमोर मनिषा फडतरे यांचे आव्हान आहे. आंधळी गटातून सोनल गोरे यांच्या विरोधात दिपाली जगदाळे मैदानात आहेत.
खटाव गटातून डॉ. प्रिया शिंदे यांनी निवडणूक लढवली असून राष्ट्रवादीचे राहुल पाटील त्यांच्यासमोर आहेत. मंद्रुळकोळे गटात प्राची नरेंद्र पाटील आणि मृणाल पाटील यांच्यात लढत आहे. कोळकी गटातून सह्याद्री कदम आणि जयकुमार शिंदे यांच्यात सामना झाला. बावधन गटातून दिप्ती पिसाळ यांच्या विरोधात ऋतुजा शिंदे उभ्या आहेत. पुसेसावळी गटात तेजस्विनी कदम आणि रिया पिसाळ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आता मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





