पिंपरी: चिंचवड येथून अपहरण झालेल्या आठ वर्षीय बालकाची खंडणी विरोधी पथकाने भुसावळ येथून सुखरूप सुटका केली. सोमवारी (दि.३१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी शिताफीने तपास करीत अवघ्या काही तासांत भुसावळ येथे रेल्वेतून आरोपीला ताब्यात घेतले. गजानन सुपडा पानपाटील (वय २५, रा. पुनई, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आठ वर्षीय मुलाच्या आईने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील एक दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आपल्या आठ वर्षीय मुलासह पिंपरी चिंचवड शहरात कामासाठी आले होते. आरोपी गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे. आरोपी गजानन हा देखील शहरात कामाच्या शोधात आला होता. मात्र, त्याला काम मिळाले नाही. संबंधित पती-पत्नी दोघे कामाला जात होते. त्याचा आठ वर्षीय मुलगा हा घरीच राहत होता. त्यावेळी आरोपी त्याच्याशी जवळीक साधत असे. मुलाला काही खाद्य पदार्थ खायला देत होता. एकदा त्याने मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या आईने मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले होते.
दरम्यान, ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने मुलाचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच खंडणी विरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आरोपीचा फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त केला. तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी मुलाला रेल्वेने घेऊन जात असल्याचे निदर्शनात आले. त्यानुसार, भुसावळ पोलिस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, भुसावळ रेल्वे स्टेशन, मुक्ताईनगर, जळगाव, चाळीसगाव पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीची शहानिशा करत काशी एक्सप्रेसमध्ये बसलेल्या आरोपीला ताब्यात घेत अपहृत बालकाची सुटका केली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुराडे यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर, खंडणी विरोधी पथकाचे देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक सुनील भदाणे, सहायक निरीक्षक सुनिल कानगुडे, अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, प्रदीप गोडांबे, रेल्वे सुरक्षा बलचे सहायक उपनिरीक्षक नागेश माळी यांनी कामगिरी केली.
५० हजार घे, मुलगा दे
फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. तो आई आणि सावत्र वडिलांबरोबर राहत आहे. आरोपी या मुलाच्या सावत्र वडिलांच्या भावाचा मित्र आहे, आरोपी गजानन याची फिर्यादी महिलेवर वाईट नजर होती. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही केली होती. तसेच मुलगा मला दे, मी तुला ५० हजार, एक लाख रुपये देतो, असेही सांगितले होते. मात्र महिलेने त्याला नकार दिल्याने अपहरणाचा डाव आखला.